‘आपण जे पाहतो त्यापेक्षा अधिक डोळसपणे साहित्यिक पाहतो. त्या सहजतेतूनच त्याचे साहित्य जन्मते. लिहिण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण व अधिकाधिक वाचन हवे’, असा प्रेमळ सल्ला डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. औचित्य होते मराठी विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे. ज्याचे साहित्य आपण वाचतो त्या साहित्यिकाला ‘याची देही याची डोळा’ अनुभवता यावे यासाठी लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मराठी विभाग आणि वाङ्मय विभागातर्फे राबविला जातो. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘कविता आकलन व आस्वाद’ या विषयीची अनेक पदर डॉ. ढेरे यांनी उलगडून दाखविले. कविता रचनेत महत्वाचा असतो तो कवितेचा घाट हे समजावून सांगताना त्यांनी कुसुमाग्रज यांच्या ‘आगगाडी आणि जमीन’ या कवितेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळ आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निधी पटवर्धन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.








Visitors Online : 0