चांदेराई येथे सुरु असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरात डॉ. दिनेश माश्रणकर यांनी ग्रामीण भागातील रोजगार संधी या विषयावर शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.
गावातील स्थलांतर थांबवायचे असल्यास ग्रामीण भागात नाविन्य पूर्ण उपक्रमांची आवश्यकता आहे. कोकणातील ग्रामीण भागात रोजगार सक्षम होण्याच्या अनेक संधी असून त्या दृष्टीने स्थानिक उपक्रमांची, शेती विकासाची आवश्यकता आहे, स्वावलंबनाची प्रवृत्ती निर्माण होणे आवश्यक आहे, स्थानिक पर्यटन, प्रक्रिया उद्योग, खादय प्रक्रिया, फळ, फुलशेती अशा अनेक संधी उपलब्ध आहेत.
सेंद्रिय शेती उत्पादन घेणाऱ्या खानू गावासारखे आदर्श निर्माण करणे आवश्यक, खानू खजानासारखे ब्रॅण्ड निर्माण होणे आवश्यक आहे. विष मुक्त शेती ही भाविष्यातील गरज आहे, बहुपिक पद्धती कोकणात फायदेशीर ठरू शकेल , दापोली कृषी विद्यापीठाने या विषयी केलेले संशोधन आपण लक्षात घेतले पाहिजे, स्ट्रॉबेरी उत्पादनाने आज प्रसिद्ध आहेत, आंबा, काजु, नारळ, कोकम यांच्या शेती व प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता आहे, बांबू उत्पादन, कोकणी मेवा व त्यांची बाजारपेठ यांचा अभ्यास करुन उच्चशिक्षित युवकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी रोजगार शक्य आहे.
पशुपालन, कृषी पर्यटन, समुद्र किनारा पर्यटन, ध्यानधारणा केंद्र, आरोग्य पर्यटन अशा अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. आपल्या बुद्धीचा व कौशल्यांचा वापर जाणीवपूर्वक करून रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेता येईल. विद्यार्थ्यांच्या सवयी बदलणे ही आवश्यक आहे, या सवयी बदलाच्या संधी शिबिरातून उपलब्ध होते स्वयंसेवकांनी याचा फायदा करुन घ्यावा असे मार्गदर्शन डॉ.माश्रणकर यांनी केले. प्रा.विनायक गावडे यांनी अहवाल नोंदी व लेखन या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी यांनी डॉ.माश्रणकर व प्रा.विनायक गावडे यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या प्रसंगी प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन उपस्थित होते. वसुंधरा ग्रुपच्या स्वयंसेवक विदयार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. आपल्याला भविष्यात या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.