रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच समाजशास्त्र विभागाच्या स्वयंसेवक व विद्यार्थांनी यात सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
सरदार पटेल यांनी ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताच्या एकतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हे पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. विशेषतः तरुणांमध्ये राष्ट्रीय गौरव, देशभक्ती आणि देशाप्रती सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळकटी देणे आणि विविधतेत एकता हे भारतीय वैशिष्ट्य अधोरेखित करणे हा या पदयात्रेचा एक महत्त्वाचा भाग होता. माननीय पंतप्रधानांच्या ‘जनभागीदारीतून राष्ट्र निर्माण’ (Nation – building through public participation) या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, सहभागींना विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश घेऊन हि पदयात्रा आयोजित केली गेली होती. अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथून सुरू होऊन जयस्तंभ मार्गे मारुती मंदिर आणि पुन्हा स्टेडियम येथे समाप्त झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनातून आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. उमा जोशी यांच्या नियोजनातून महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी या पदयात्रेत यशस्वी सहभाग घेतला. रत्नागिरीतील अनेक महावियालये , शाळा व संस्था या पदयात्रेत सहभागी होत्या.
![]() |
![]() |








Visitors Online : 0