मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी यांचा संयुक्त विदयमाने द्वितीय सत्र विस्तार कार्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत निवडणूक साक्षरता कार्यक्रम याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वंभर जाधव तसेच मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव आणि अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने १००% साक्षरतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन निवडणूक साक्षरतेचे विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांची माहिती देताना प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक कार्य करताना विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. समाजामध्ये निवडणूक साक्षरता वाढीस लागली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षर व्हावे असे आवाहन केले.
निवडणूक साक्षरता म्हणजे लोकशाही बाबत सज्ञान राहुन लोकशाहीने दिलेला अधिकार आणि निवडणुकीबाबतची आपली भूमिका पार पाडणे. याबाबतची सविस्तर माहिती देताना डॉ. विश्वंभर जाधव यांनी विविध मुद्दे स्पष्ट करताना प्रत्येक महाविद्यालयाने स्वतःचे निवडणूक साक्षरता केंद्र उघडून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक होणार आहे. त्यामुळे त्यांनाही याच वयात ही माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून निवडणुक अधिकाराबाबत व निवडणूक प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती देणे, निवडणूक अधिकार बजावणे व हे कर्तव्य बजावताना घ्यायची काळजी, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील एकंदर कार्यवाही आणि लोकशाही यांची सविस्तर माहिती आज डॉ. विश्वंभर जाधव यांनी दिली.
आजीवन अध्ययन आणि विस्तारकार्याची माहिती देताना डॉ. कुणाल जाधव यांनी मुंबई विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रत्येक महाविद्यालयात विभागा अंतर्गत निवडणुक साक्षरता युनिट स्थापन करून निवडणूक साक्षरतेचे महत्व विविध उपक्रमांद्वारे समाज घटकांना पटवून द्यावे असे आवाहन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३० शिक्षक त्याचबरोबर ५२ विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे हे मोठं प्रमाण निवडणूक साक्षरतेचे महत्व दर्शवते. याकार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत व प्रास्ताविकडॉ. शिवराज गोपाळे व सुत्र संचालन व आभार प्रा. सुर्यकांत माने यांनी मानले. यासाठी विभागातील प्रा. अंबादास रोडगे, डॉ. अजिंक्य पिलणकर यांचे सहकार्य लाभले.